तसा हा कार्यक्रम होऊन खूप दिवस झाले आहेत. मग आजच त्याबद्दल का लिहावेसे वाटले?
लहान मूल घराबाहेर जाऊ नये म्हणून दरवाजात लाकडी फळी लावली जाते…च्यायला शब्दांचेही तसेच आहे. डोक्यात किडा वळवळत असतो, पण कसली तरी अज्ञात फळी आडवी येते, मग शब्द अडतात. आता मात्र फळी ओलांडून शब्द अखेर बाहेर आलेत.
तर म्हाराजा, ही कथा आहे सावंतवाडीतील मडकईकरांची. मालवणी कवितेतील ही “दादा”गिरी आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुठल्याच राजकीय पक्षाची याबद्दल कसलीही तक्रार नाही.
दादा यांच्या ‘सुरंगेचो वळेसार’ या मालवणी कविता संग्रहाचे दणकेबाज प्रकाशन सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते मुंबईत झाले. आता मालवणी माणसे एकत्र आल्यावर काय होते…एकतर बारा पाचाचा जाप होतो , नाहीतर कडकडीत गाऱ्हाणे होते. हे वाचून मालवणी माणसाने उगीच रागावू नये. कारण त्याच्यातील देवभोळेपणाचे हे कौतुक आहे असे समजा.
तर म्हाराजा, आशिष शेलार हे कट्टर मालवणी. त्यामुळे त्यांनी कार्यक्रमाची अखेर गाऱ्हाण्याने व्हायलाच हवी असे सांगत ज्येष्ठ पत्रकार विद्याधर चिंदरकर आणि कालनिर्णयवाले जयेंद्र साळगावकर या दोघांना व्यासपीठावर बोलावले. दोघे म्हणाले, आम्हाला काय गाऱ्हाणे येत नाही बुवा….
मग शेलारांची नजर भिरभिरली आणि शेवटच्या रांगेत बसलेल्या अस्मादिकाला बोलावून घेतले.
मग काय म्हाराजा, राणे नावाचे “खोत” थेट गावकराच्या भूमिकेत शिरले आणि जमेल तसे गाऱ्हाणे घातले….
हे गाऱ्हाणे मालवणीच्या दादागिरीसाठी…
हे गाऱ्हाणे शेलार, चिंदरकर आणि साळगावकर या तीन कट्टर मालवणी मित्रवर्यांच्या प्रेमासाठी…
हे गाऱ्हाणे “सुरंगेच्या वळेसरा”साठी!
जय मालवणी!!
Ref : WhatsApp Post Shared by Shri. Rajanish Rane